अहिल्यानगर : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवारांसह एकूण सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. डीजीसीए (DGCA) कडून या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
अवश्य वाचा ः यंदाच्या प्रजासत्ताक दिनी पाच हजार विद्यार्थ्यांची एकाच वेळी कवायत
अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून एका सभेसाठी बारामतीला निघाले होते. बारामती विमानतळाच्या शेजारीच लँडिंग दरम्यान विमानाला अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तीन दिवसांचा शासकीय दुखवटा
राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गृहमंत्र्यांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका दुःखद अपघातात निधन झाल्याच्या बातमीने माझे मन खूप सुन्न झाले आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून अजित पवार यांनी महाराष्ट्रातील समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी ज्या पद्धतीने स्वतःला समर्पित केले. त्यांचे निधन हे केवळ एनडीए कुटुंबाचेच नाही, तर माझ्यासाठीही एक वैयक्तिक नुकसान आहे. मी पवार कुटुंबाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी, संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
पवारांचा अपघात संशयास्पद; वकिलाच्या आरोपाने खळबळ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळाजवळ विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला असून वकील नितीन सातपुते यांनी या अपघातावर संशय व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
अजित पवारांचे शेवटचे ट्विट
महान स्वातंत्र्यसेनानी, ‘पंजाब केसरी’ लाला लाजपत राय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! त्यांची राष्ट्रनिष्ठा आपल्याला कायमच प्रेरणा देत राहील.” असे आज अपघातापूर्वी सकाळी ८:५७ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी x वर शेवटचे ट्विट केले होते
नेमकं विमान अपघात कसा झाला?
सकाळी ज्यावेळी विमान बारामतीत पोहोचलं तेव्हा बारामतीत दाट धुकं होतं. धावपट्टी दिसत नव्हती. बारामती सारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर आयएलएस सिस्टम उपलब्ध नव्हती. यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीने विमान उतरावं लागतं. पण धावपट्टीच दिसत नव्हती. तरीही पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं. आकाशात एक मोठी घिरटी घालून आणि धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा लँडींग करायला आलं. दुसऱ्यांदा लँडींग करताना विमान यशस्वीपणे उतरेल, असा अंदाज होता. मात्र, तसं झालं नाही. एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजूला गेलं. पायलटने विमान धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यात पायलटला अपयश आलं आणि पुढच्या ४ ते ५ सेकंदात विमानाचा मोठा स्फोट घडून अपघात झाला. ज्या विमानतळावर आयएलएस सिस्टमची सुविधा नसते, अशा विमान तळावर वैमानिकांना आपल्या डोळ्यांनी पाहून धावपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो. पण सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं असल्याने वैमानिकाला हा अंदाज घेता आला नाही. पहिलं लँडींग फसल्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला. पण यात अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला.
निधनाचे वृत्त कळताच जरांगे पाटील बारामतीत दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. .अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच कार्यकर्त्यांनी बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच मनोज जरांगे पाटील देखील बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातावर प्रतिक्रिया देताना ते चांगलेच भावुक झाले हाेते.
