Hindu Janajagruti Samiti : अहिल्यानगर : “हिंदूंचा हिंदुस्थान हिंदू राष्ट्र होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित राहून धर्माचरण करणे, ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन नाथ संप्रदायाचे संशोधक व प्रवचनकार मिलिंद महाराज चवंडके यांनी केले.

हिंदू जनजागृती समितीतर्फे नेप्ती नाका येथील मार्कंडेय संकुलात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात गुरूपूजन, सामूहिक नामजप आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाच्या वाचनाने झाली.

यावेळी बोलताना मिलिंद महाराज चवंडके म्हणाले की, १९९० च्या दशकापासून डॉ. जयंत आठवले यांनी हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला नवे बळ दिले. भविष्यातील हिंदू राष्ट्र हे राष्ट्रभक्त, सात्त्विक समाज आणि सात्त्विक शासनकर्त्यांवर आधारित असेल. प्रभू श्रीरामांच्या रामराज्याप्रमाणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे आदर्श राष्ट्र उभारण्यासाठी समाजाने संघटित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, गुरुकुल परंपरा, सोळा संस्कार, मंदिरे, सण-उत्सव आणि पारंपरिक मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले. युवक-युवतींनी बलोपासना आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घ्यावे, तसेच आपल्या परिसरात सुसंवाद, आपुलकी आणि सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
दररोज नामस्मरण, उपासना, मंदिर दर्शन, धर्मकार्यात सहभाग आणि आई-वडिलांसह गुरूंचा सन्मान करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. धर्माभिमान, सात्त्विक जीवनशैली आणि सामाजिक जबाबदारी यांचा स्वीकार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

