वारकऱ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
Ashadhi Wari 2026 : अहिल्यानगर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक असून लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे वारी मार्गावरील सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून सुरक्षित, स्वच्छ आणि सुरळीत वारीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, “जिल्ह्यातून आणि इतर भागांतून अनेक दिंड्या पंढरपूरकडे जात असतात. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून ते खड्डेमुक्त करावेत. दिंडी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्थापन चोखपणे करावे. मुक्कामस्थळी चोरी, गैरप्रकार अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेऊन पोलिसांची गस्त वाढवावी.
दिंडी मार्गावरील सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्नानगृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण तसेच अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
वारकऱ्यांसाठी आवश्यक वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, औषधसाठा आणि आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध ठेवण्याबरोबरच महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.