Narmada Purana Katha : चिखली : श्रावणातील नर्मदा पुराणाच्या भक्तिधारेने चिखलीत अध्यात्माचा सोहळा रंगला. नर्मदा मातेच्या चरित्राचे श्रवण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. “नर्मदा ही केवळ नदी नव्हे, तर जीवांचे पापक्षालन करणारी परमेश्वराची विभूती आहे,” असे सांगत मिलिंद महाराज चवंडके यांनी नर्मदा महिम्याची अनुभूती भाविकांना घडविली.

येथील जागृत हनुमान मंदिराच्या सभामंडपात श्रावण महिन्यानिमित्त प्रथमच आयोजित नर्मदा कथा निरूपण सोहळ्याचे द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. कथा सोहळ्याच्या आयोजक शारदाताई वायाळ यांनी स्वागत केले. ह.भ.प. ज्योतीताई इंगळे यांनी स्वरचित आरती व नामगजर सादर केला. सिद्धेश्वर कपाळे व संध्याताई कपाळे, सुभाष सावके व दुर्गाताई सावके तसेच बाळासाहेब भुतेकर व पुष्पाताई भुतेकर या दाम्पत्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.


मिलिंद महाराज चवंडके म्हणाले की, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चतुर्युगांचा मिळून एक कल्प होतो. कृतयुगापासून नवीन कल्पाला प्रारंभ होतो. प्रत्येक कल्पाच्या अंती प्रलय, तर सात कल्पांच्या अंती महाप्रलय होतो. मायूर, कौर्म, पाद्म, तामस, मात्स्य, द्विरद आणि वाराह हे सात महाघोर कल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
भगवान शिवांनी जीवांचे पापक्षालन करण्यासाठी नर्मदेला प्रकट केले. नर्मदा हे नामकरणही भगवान शिवांनीच केले. शिवाच्या अंगातून उद्भवलेली नर्मदा ‘अमृता’ म्हणून विख्यात पावली.

