Ashadhi Wari Seva : अहिल्यानगर : आषाढी वारीच्या मार्गावर पंढरपूरपर्यंत पोहोचून वारकऱ्यांना महाअन्नदानासाठी आवश्यक शिधा पुरविण्याची सेवा ही केवळ अन्नदान नसून अलौकिक समष्टी साधनाच आहे. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता गेल्या २१ वर्षांपासून मिलिंद महाराज चवंडके यांच्याकडून सुरू असलेली ही निरपेक्ष सेवा वाखाणण्याजोगी आहे, असे गौरवोद्गार श्री संत मुक्ताबाई पालखीचे प्रमुख मंगेश महाराज जळगांवकर यांनी काढले.

आपल्या शहरात, परिसरात, कॉलनीत, गावात किंवा वस्तीवर आषाढी वारीला निघालेली दिंडी आली की अन्नदानासाठी अनेक हात पुढे येतात. मात्र, वारी मार्गावर पंढरपूरपर्यंत एकदा नव्हे, तर चार-पाच वेळा जाऊन वारकऱ्यांना भोजनासाठी आवश्यक शिधा पोहोचविण्याची सेवा करणारे मिलिंद महाराज चवंडके हे आषाढी वारीच्या इतिहासातील एकमेव सेवेकरी असल्याचे म्हणावे लागेल. मार्गस्थ वारकऱ्यांना भोजनासाठी शिधा कमी पडू नये, यासाठी ते ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता वारी मार्गावर आपलेपणाने संपर्क साधत सेवा बजावत आहेत.
या सेवेत अन्नदानाची इच्छा असलेल्या सर्व भाविकांना सहभागी करून घेऊन खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता आणि एकात्मता साधली जात आहे. केवळ शिधा पुरविण्यापुरती ही सेवा मर्यादित नसून, थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना आयुर्वेदिक तेलाने मालिश करणे, प्रथमोपचाराचे साहित्य उपलब्ध करून देणे तसेच थंडी, ताप, जुलाब आणि अंगदुखीवरील औषधांची व्यवस्था करणे, अशी व्यापक सेवा केली जाते. वारकऱ्यांमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेत सेवा करण्याचा आनंद अनुभवत, सर्वव्यापी ईश्वराशी एकरूप होता येते, हे मिलिंद महाराज चवंडके यांच्या सेवेतून दिसून येते.

