Rain Alert : अहिल्यानगर : जिल्ह्यावर पुढील चार दिवस अवकाळी संकटाचे सावट असून विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाच्या शक्यतेमुळे हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. नागरिकांसह शेतकऱ्यांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३१ मे ते ३ जूनदरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटा वेळी झाडाखाली, मोकळ्या मैदानात किंवा उंच धातूच्या संरचनांजवळ थांबू नये. वीजेचे खांब, टॉवर, रोहित्र, लोंबकळणाऱ्या केबल्स तसेच विद्युत उपकरणांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यामुळे जाहिरात फलक, झाडांच्या फांद्या किंवा इतर वस्तू कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समित्यांमध्ये आणलेल्या मालाची योग्य व्यवस्था करावी तसेच जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. धरण, नदी व कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी विशेष दक्षता घेऊन पाण्यात उतरणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.