Bakri Eid २०२६ : ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून शांतता, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात आला आहे. नियमभंग, विनापरवाना वाहतूक आणि अनधिकृत कत्तलीवर कठोर कारवाईचा इशारा देत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समिती व प्राणी क्लेश प्रतिबंधक जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त उमेश पाटील, सहायक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे, अन्न व औषध निरीक्षक जी. बी. भोर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. आशिया म्हणाले, “सण उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याची विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांच्या वाहतुकीदरम्यान तसेच कत्तलीच्या प्रक्रियेत प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे. विनापरवाना जनावरांची वाहतूक, सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत कत्तल आणि अस्वच्छता आढळल्यास संयुक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
काही तालुक्यांत तात्पुरत्या कत्तलखान्यांची मागणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक परवानग्या, स्वच्छता आणि नियमांचे पालन याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.
कत्तलखाने व अन्य ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ ठेवावा. नागरिकांच्या धार्मिक भावना, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखत प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
