Saklai Irrigation Scheme : अहिल्यानगर : अहिल्यानगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३२ गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेला आज (बुधवार) मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे १२३४ कोटींच्या या प्रकल्पामुळे ९६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून हिवरे झरे परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला.
तब्बल अनेक दशकांपासून प्रलंबित असलेली ही योजना अखेर मंजूर झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ एप्रिल २०१९ रोजी वाळकी येथे झालेल्या सभेत साकळाई योजनेला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता. सात वर्षांनंतर तो शब्द पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
या योजनेस मंजुरी मिळण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनीही केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करत ही योजना मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक कृती समितीनेही अनेक वर्षे संघर्ष, आंदोलने, बैठका व निवेदने देत हा विषय जिवंत ठेवला होता.
१२३४ कोटींचा प्रकल्प; चार वर्षांत पूर्ण होणार
या उपसा सिंचन योजनेचा एकूण खर्च १२३४.१३ कोटी रुपये असून पुढील चार वर्षांत ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसगाव येथून चार टप्प्यांत पाणी उचलून श्रीगोंदा व नगर तालुक्यातील ३२ गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत लघू पाझर तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे, गाव तळी भरून घेणे यासारखी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी १.६० टीएमसी पाणी सिंचनासाठी व ०.२० टीएमसी पाणी पिण्यासाठी देण्याचे नियोजन आहे.
२०८ मीटर उंचीवर पाणी उपसा
या प्रकल्पासाठी म्हैसगाव येथे तत्काळ पंपगृह उभारण्यात येणार असून त्यानंतर आणखी तीन पंपगृह बांधण्यात येतील. चार पंपगृह व तीन वितरिकांद्वारे हे काम पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये २०८.३४ मीटर उंचीवर पाणी उपसा करून चिखली व घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी एकूण ३९.७१ हेक्टर जमीन आवश्यक असून त्यापैकी ३०.२३ हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे.
हिवरे झरे येथे जल्लोष
साकळाई योजनेला मंजुरी मिळताच हिवरे झरे परिसरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. अनेक वर्षांपासून “साकळाई योजना मंजूर झालीच पाहिजे” अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
