Radhakrishna Vikhe Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली असून, शेतकरी कल्याण, सिंचन, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात राज्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान तसेच कृषी पंपांच्या थकीत वीजबिलांची माफी असे ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रवरानगर येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, “स्व. अजित पवार यांनी जलसंपदा क्षेत्रात दूरदृष्टीचे निर्णय घेतले. निळवंडे धरणाच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी आर्थिक मोबदला देण्याच्या निर्णयामुळे पुनर्वसन प्रक्रिया गतिमान झाली. त्यामुळे राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लागण्यास मदत झाली.

