Census : अहिल्यानगर : वेगवान कामकाज, अचूक माहिती संकलन आणि प्रभावी जनसहभागाच्या जोरावर अहिल्यानगर महापालिकेने जनगणना मोहिमेत राज्यात दुसरे मानाचे स्थान मिळविले. विशेष म्हणजे ३० दिवसांचे उद्दिष्ट केवळ २१ दिवसांत पूर्ण करून प्रशासनाने नवा आदर्श निर्माण केला.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या जनगणना मोहिमेत मिळालेल्या या यशामागे प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, जनगणना कक्ष प्रमुख राकेश कोतकर, सर्व प्रभाग अधिकारी, ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. अमोल बागुल, मास्टर ट्रेनर्स, प्रगणक, पर्यवेक्षक तसेच तांत्रिक पथक यांचे समन्वयपूर्ण नेतृत्व आणि अथक परिश्रम मोलाचे ठरले.
या यशाबद्दल आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांचे आभार मानताना सांगितले की, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळेच मोहिमेला अपेक्षेपेक्षा अधिक गती मिळाली. मोहिमेदरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यात आल्या. तसेच दर चार दिवसांनी आढावा बैठका घेऊन पुढील नियोजन आणि आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.
अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांनी सांगितले की, जनजागृतीसाठी विविध नावीन्यपूर्ण माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला. प्रेरणादायी गीते, माहितीपर चित्रफिती, ग्राफिक संदेश, आकाशवाणीवरील मुलाखती, जिंगल्स आणि समाजमाध्यमांद्वारे नागरिक, प्रगणक व पर्यवेक्षकांचे सातत्याने प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे मोहिमेला व्यापक लोकसहभाग लाभला.
अचूक माहिती संकलन, वेळेचे काटेकोर नियोजन, प्रभावी जनजागृती आणि संघभावनेच्या बळावर अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात मानाचे स्थान मिळविले आहे. ही कामगिरी भविष्यातील प्रशासकीय उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून जनगणना कार्यात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रगणक, पर्यवेक्षक आणि सहायक पथकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.