Dr. Babasaheb Ambedkar : स्वातंत्र्य
समता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजासाठी दीपस्तंभ आहेत. हे विचार जीवनात उतरवल्यासच सकारात्मक परिवर्तन शक्य होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, जात पडताळणी विभागाचे सदस्य सचिव अनिल तिदमे, व्याख्याते डॉ. बापू चंदनशिवे, सीएसआरडीचे डॉ. सुरेश मुगुटमल, संजय आरणे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “डॉ. आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले. देशातील सर्वसामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळवून देत त्यांनी लोकशाहीची भक्कम पायाभरणी केली. त्यामुळेच आज देशातील लोकशाही सक्षमपणे टिकून आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर अखंड संघर्ष केला. सर्व घटकांना सोबत घेऊन समानतेचा मार्ग समाजासमोर ठेवला. त्यांच्या विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास समाजात सकारात्मक आणि शाश्वत परिवर्तन घडू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

