Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर : अहिल्यानगर शहराला राज्यातील अग्रगण्य शहर म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावी नियोजनाची गरज आहे. त्यासाठी व्यावसायिक, औद्योगिक आणि नागरीकरणाच्या दृष्टीने शहराचा सर्वंकष विकास साधण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करून तो पूर्णत्वास नेण्यावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शहरातील गुलमोहर रोड परिसरात नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन उभारण्यात आलेल्या नवीन स्ट्रीट लाईट प्रकल्पाचे उद्घाटन विद्यार्थी आर्या घोडके, पार्थ खंडेलवाल, रिधान शिंदे आणि पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेविका गौरी बोरकर, नगरसेवक ऋग्वेद गंधे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शहराची ओळख निर्माण झाली असून त्या नावाला साजेसा विकास घडवून आणणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी विविध विकासकामांना गती दिली जाईल.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्याचे नियंत्रण पोलीस अधीक्षक कार्यालयातून केले जात आहे. भविष्यात या यंत्रणेचा अधिक विस्तार करून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहर व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर दिला जाईल. नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, गुलमोहर रोड परिसरातील लहान मुलांनी स्ट्रीट लाईटची लेखी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे काम पूर्ण करण्यात आले. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची सवय अंगीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.