Drug Free : अहिल्यानगर : जिल्ह्यात ड्रग्सविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून कारवाईसाठी तपास यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत अमली पदार्थांच्या ४० प्रकरणांमध्ये ५५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी गिते म्हणाले, “शाळा व महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यावर भर द्यावा. तसेच ड्रग्स डिटेक्शन किट्स व टेस्टिंग केमिकल्स यांची उपलब्धता सुनिश्चित करून तपास यंत्रणेला अधिक सक्षम करावे. पोलीस विभाग, एनसीबी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी केलेल्या कारवाईची माहिती एकत्रित करून अद्ययावत डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ड्रग्सविरोधी कारवाईत विभागांमधील समन्वय वाढवून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात,”असेही त्यांनी स्पष्ट केले.
अशी झाली कारवाई
सहायक पोलीस निरीक्षक भोये म्हणाले, “जिल्ह्यात १ जानेवारी ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत अमली पदार्थ बाळगणाऱ्या ९ प्रकरणांमध्ये १२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच लागवडीच्या २ गुन्ह्यांमध्ये ३ व्यक्तींवर, वाहतुकीसंदर्भातील ३ प्रकरणांमध्ये ८ व्यक्तींवर, तर अमली पदार्थ सेवनाच्या २६ प्रकरणांमध्ये ३२ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण अमली पदार्थांशी संबंधित ४० प्रकरणांमध्ये ५५ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.”