Women’s Self-Help Groups : अहिल्यानगर : जिल्ह्यात महिला बचत गटांनी ‘लोकल टू ग्लोबल’ यशोगाथा साकारत १६८ कोटींच्या उद्दिष्टावर मात करून तब्बल ३५३ कोटी ९ लाख रुपयांचे विक्रमी कर्जवाटप केले. ३० हजारांहून अधिक बचत गटांशी ३ लाखांपेक्षा जास्त महिला जोडल्या गेल्या असून ‘लखपती दीदी’ अभियानातही अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

जिल्ह्यात सध्या ३० हजार ११२ बचत गट सक्रिय असून, त्यांच्याशी ३ लाख १५ हजारांहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे बँक कर्जवाटपासाठी १६८ कोटी २० लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात तब्बल ३५३ कोटी ९ लाख रुपयांचे विक्रमी कर्जवाटप झाले आहे. ही झेप महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या समन्वयातून शक्य झाली आहे. या आर्थिक पाठबळामुळे महिलांनी आत्मनिर्भरतेची नवी वाट निवडत ‘लोकल टू ग्लोबल’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.

