Election Commission : राज्याचं लक्ष लागलेल्या राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (ता. १५) तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पद्दुचेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी व पुणे जिल्ह्यातील बारामती, अशा दोन्ही मतदारसंघाची २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तर ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सामना रंगतो की निवडणूक बिनविरोध होते, हे पाहणे गरजेचे आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे १७ ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. तसेच दुसरीकडे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान दुर्घटनेत निधन झाले होते. यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामतीची विधानसभेची जागा पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार लढवणार असल्याचे जाहीर केले होते. तर राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून अक्षय कर्डिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली आहे.

