Police : अहिल्यानगर : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल व गोमांस वाहतूक करणाऱ्या राहता तालुक्यातील ममदापूर येथील आठ जणांच्या टोळीला अहिल्यानगर जिल्ह्यातून तब्बल १८ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार हद्दपार केलेल्या प्रकरणात टोळी प्रमुख फैजान जब्बार कुरेशी (शेख) (वय २५, रा. कुरेशी मोहल्ला, ममदापूर, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) याच्यासह मुन्तजीर मुनिर कुरेशी (वय २३), अब्दुलकरीम अमिर कुरेशी (वय ५२), मुनिर अमिर कुरेशी (वय ५६), जब्बार हसन कुरेशी (शेख) (वय २३), नाजीम आयुब कुरेशी (वय ३३), वसीम आयुब कुरेशी (वय २७) आणि रिजवान महेबुब कुरेशी (वय २५) यांचा समावेश आहे.
या हद्दपार केलेल्या टोळीवर मागील पाच वर्षात खुनाचा प्रयत्न, गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक व कत्तल तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे विविध गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, कोणीही उघडपणे तक्रार किंवा साक्ष देण्यासाठी पुढे येत नव्हते.
या पार्श्वभूमीवर लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार संबंधितांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग अमोल भारती यांनी चौकशी करून अहवाल सादर केल्यानंतर सखोल तपासाअंती संबंधित आठही जणांना अहिल्यानगर जिल्ह्यातून १८ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.
नागरिकांच्या सुरक्षेत वाढ
या कारवाईमुळे राहाता व लोणी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.